शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! अधिवेशनानंतर शिक्षकांच्या प्रश्नाबाबत बैठक
शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!
अधिवेशनानंतर शिक्षकांच्या प्रश्नाबाबत बैठक
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने तसेच शिक्षक संघाच्या आगामी होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या (माजी आमदार शिवाजीराव पाटील गट) शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.या भेटीत राज्यातील शिक्षकांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे ५ व ६ मार्च रोजी मुंबई येथे होणारे शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन तूर्तास पुढे ढकलण्यात येत असून लवकरच हे अधिवेशन मुख्यमंत्री व मान्यवर मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.असे तूर्तास पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले.
या शिष्टमंडळात शिक्षक संघाचे राज्य नेते माधवराव पाटील, राज्याध्यक्ष केशवराव जाधव, राज्य सल्लागार राजाराम वरुटे, राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट, जिल्हाध्यक्ष बबन केकरे, डी.पी. पाटील, बजरंग लगारे, प्रताप राबाडे यांच्या शिष्टमंडळाने, शिक्षक आणि शाळेशी निगडीत विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्या दालनात ही भेट झाली. याप्रसंगी आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी उपस्थित होते. सध्या शिक्षकांच्या संचमान्यता सारख्या न्याय मागण्या, सेवा-शर्ती विषयक अडचणी मांडल्या. या भेटीत शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी, शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
चौकट-
शिक्षकांच्या प्रश्नाबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक- राजाराम वरुटे
‘शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. टीईटी परीक्षेकडे लक्ष वेधले. मुख्यालय राहण्याची अट रद्द करावी हा मुद्दा निदर्शनास आणला.मुख्यमंत्री महोदयांना मागण्यांचे निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्प सादरकेल्यानंतर शिक्षकांशी निगडीत जी जी प्रश्ने आहेत, त्यासंबंधी मार्ग काढण्यासाठी बैठक घेऊ या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.’










