विद्यार्थी गुणांसोबत गुणवंत व्हायला हवेत.-प्रा.युवराज पाटील,जि प कर्मचारी सोसायटी येथे गुणगौरव समारंभ संपन्न
विद्यार्थी गुणांसोबत गुणवंत व्हायला हवेत.
कोल्हापूर/मारुती फाळके
विद्यार्थी गुणांसोबत गुणवंत व्हायला हवेत. नैतिकता आणि चारित्र्य या मूल्यांची जपणूक फार गरजेची आहे. आजच्या वर्तमानात बहुतेक गोष्टीत संवेदनशीलता हरवत चाललीय ते जपण्याच काम पालक, शिक्षक आणि समाजाने करायला हवं.प्रत्येकाच्या ठायी अंगभूत कौशल्ये असतात ती ओळखायला शिका,जीवनात परफ्युम ने नव्हे तर कष्टाच्या घामाने यशाचा सुगंध दरवळतो असे मत प्रा.युवराज पाटील यांनी व्यक्त केले, ते जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी च्या वतीने आयोजित सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार व सेवानिवृत्त सभासद कर्मचारी यांच्या गुणगौरव समारंभात बोलत होते.
ते म्हणाले, तुम्ही भविष्यात कोणत्या क्षेत्रात काम करणार हे महत्त्वाचं नसून ते काम किती मन लावून करणार हे महत्त्वाचं. विद्यार्थी दशेतच योग्य मूल्यांची जपणूक व्हायला हवी. महापुरुषांचे विचार कृतीत आणायला हवेत. श्रमप्रतिष्ठा अधिक वेगाने रुजायला हवी; या साऱ्यांमुळे आदर्श व्यक्तिमत्वाची जडणघडण होईल. योग्य वयात आपल्या जीवनात जीवननिष्ठा रुजायला हवी.समाजासाठी काम करणारे खरे हिरो समजायला हवेत.राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचा सहभाग वाढेल, तेव्हाच देशाची उभारणी होईल असे मत सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीतर्फे सभासदांच्या दहावी-बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत मुलांचा गौरव, कला-क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान आणि सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार अशा संयुक्त समारंभ झाला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा परिषदेच्या सामान् प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, मुख्य वित्त व लेखाधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर हे प्रमुख अतिथी होते. सोसायटीच्या महालक्ष्मी सभागृहात शनिवारी (४ नोव्हेंबर) हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. पाटील बोलत होते. याप्रसंगी सर्वच ्रपाहुण्यांनी जिप सोसायटीच्या कामकाजाचे कौतुक केले.
जिप कर्मचारी सहकारी सोसायटीचे चेअरमन रणजित पाटील यांनी सोसायटीमार्फत सभासद व त्यांच्या पाल्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सभासद हिताचा कारभार केंद्रस्थानी आहे. सभासदांच्या मुलांसाठी ग्रंथालय सुरू आहे. संस्थेचे माजी चेअरमन व मार्गदर्शक एम. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची दिमाखात वाटचाल सुरू आहे. संस्थेने कर्जावरील व्याजदर ९.२५ टक्के केला आहे.सभासदांना १२.५०टक्के लाभांश दिला आहे.’असे सांगितले.
मुख्य वित्त व लेखाधिकारी आकुर्डे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना,‘आयुष्यात चढ उतार येत असतात. अपयशनाने निराश न होता मोठया जिद्दीने आयुष्याला सामोरे जावे. सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याचा प्रवास करताना दिशा निश्चित हवी. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करावी.’ याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बाबर यांचेही भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक श्रीकांत चव्हाण यांनी तर सोसायटीचे व्यवस्थाापक व्ही. एन. बोरगे व शिक्षक संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. व्हाईस चेअरमन मुजम्मिल अहमद नावळेकर यांनी आभार मानले. समारंभाला संचालक अमर पाटील, राहूल शेळके, रविंद्र जरळी, संजय शिंदे, सचिन गुरव, नंदीप मोरे, जयकुमार रेळेकर, उत्तम वावरे, सरोजिनी कोरी, सोनाली गुरव, जितेंद्र वसगडेकर, सुरेश सुतार, अजय शिंदे, श्रीकांत चव्हाण, बाजीराव पाटील, सरदार दिंडे, साताप्पा मगदूम, सुधाकर कांबळे, नारायण आयरे, पांडूरंग पोवार आदी उपस्थित होते.
……………
सभासद व पाल्यांचा सत्कार, संस्थेच्या मार्गदर्शकांचा कोल्हापुरी फेट्यांनी सन्मान
सेवानिवृत्त सभासद, गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या मार्गदर्शकांचा कोल्हापुरी फेटा बांधून सन्मान झाला. माजी चेअरमन व मार्गदर्शक एम. आर. पाटील, विश्वास साबळे, महावीर सोळांकुरे, राजीव परीट, के. आर. किरुळकर, साताप्पा मोहिते, रवि पाटील, अनिल आवळे, एम. एम. पाटील, एम. एम. भाट, श्रीमती प्रतिभा शिर्के, किरण मगदूम, विजय टिपुगडे, एन. डी. पाटील, दगडू परीट आदींचा कोल्हापुरी फेटा बांधून सन्मान झाला.










