मुंबईत हक्काची घरे मिळाली पाहिजेत, गिरणी कामगाराचा एल्गार!
मुंबईत हक्काची घरे मिळाली पाहिजेत, गिरणी कामगाराचा एल्गार!
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
कोल्हापूर/मारुती फाळके
मुंबईत घरे मिळावीत या आणि प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी गरजवंत गिरणी कामगार व त्यांच्या वारसानी कालपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.गिरणी कामगारांना सरसकट मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोफत घरे मिळावीत या मागणीसह अन्य मागणी घेऊन हा लढा उभा करण्यात आला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व रमाकांत बने, हनुमंत निकम,संभाजी नलगे,शिवाजी बंडगर करत आहेत,आंदोलनकर्त्यात सदानंद सावंत,नंदकुमार गुरव, जयसिंग खोंगे, आनंदा पवार, लक्ष्मी कदम, आक्काताई पाटील, संगीता नाईक, सुशीला चौगुले इत्यादी गिरणी कामगार व त्यांचे वारस उपोषणाला बसले आहेत.
हे साखळी उपोषण कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २९ फेब्रुवारी पर्यंत सौम्य मार्गाने होईल. परंतु येत्या विधिमंडळाच्या अधिवेशनात गिरणी कामगारांना न्याय देण्याचा कोणताही निर्णय झाला नाही तरी १ मार्चपासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालय, ६ मार्च पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, १० मार्च तारखेपासून नवी मुंबई आणि १५ मार्च ला मुंबईत आझाद मैदानावर व्यापक स्वरूपात आंदोलन केले जाईल. न्याय मिळत नाही तोपर्यंत सर्व ठिकाणी हा लढा तीव्र केला जाईल असे गीरणी कामगार व त्यांच्या वारसदारांनी सांगितले.
——–हक्काची घरकुले मिळाली पाहिजेत….
गरजवंत गिरणी कामगारांचे संघटन च्या मागण्या
कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात गिरणी कामगार विखुरलेले आहेत, मुंबईतील कापड गिरण्या बंद झाल्या आणि त्यांच्या रोजीरोटीचा तसेच मुंबईत राहण्याचा प्रश्न निर्माण झाला.यावेळी प्रत्येकाने आपल्या घरचा रस्ता धरला., याबाबत वेळोवेळी शासनदरबारी आवाज उठविला परंतु आजतागायत या प्रश्नांची दखल घेतली नाही, मुंबई महानगरपालिका क्षेत्रात घरे हवीत या प्रमुख मागणीसाठी या गिरणी कामगारांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू केले आहे.
——-सामान्य गिरणी कामगारांचे संघटन—–
याबाबत समन्वयक रमाकांत बने, हनुमंत निकम आणि संभाजी नलगे यांच्यासह गिरणी कामगारांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस बऱ्याच काळानंतर प्रथमच कोणती संघटना,पक्ष,राजकीय नेता युनियन विरहित केवळ गिरणी कामगार व त्यांचे वारस म्हणून एकत्रित आले आहेत.सध्या कोल्हापूर जिल्हा कार्य क्षेत्रातील आंदोलक उपोषणाला बसले आहेत.
……आंदोलन कर्त्यांची न्याय्य मागणी……!
गेली ४२ वर्षे चाललेल्या संघर्षामुळे संघटना, संस्था, राजकीय पक्ष,राजकीय नेते यांच्यावरची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होताना पाहायला मिळत आहे. आता आपल्या हक्काची लढाई स्वतः लढल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही अशीही आंदोलन कर्त्यांनी भावना बोलून दाखवली. त्यामुळे सर्वसामान्य गरजवंत गिरणी कामगार एकत्र येऊन काल सकाळपासून उपोषणाद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेत आहेत. शासनाने या न्याय मागणीकडे सकारात्मक पद्धतीने लक्ष देऊन गिरणी कामगारांना न्याय द्यावा अशी आंदोलनकर्त्यांची न्याय्य मागणी आहे.










