शाळांच्या समृद्धीसाठी व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची- प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई
शाळांच्या समृद्धीसाठी व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची- प्राचार्य राजेंद्र भोई
पन्हाळा येथे शाळा व्यवस्थापन समिती राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
कोल्हापूर/मारुती फाळके
गावोगावच्या शाळांच्या गुणवत्ता व समृद्धीविकसनासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वाची असून शाळा-समिती-शिक्षक-विद्यार्थी-पालक हा अतूट बंध असल्याचे मत कोल्हापूरचे प्राचार्य राजेंद्र भोई यांनी व्यक्त केले.ते पन्हाळा येथे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूर यांचे संयुक्त विद्यमाने समग्र शिक्षा २०२४/२५ अंतर्गत शाळा व्यवस्थापन समिती राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.पन्हाळा नगरपरिषदेच्या सभागृहात ३ दिवस ही कार्यशाळा चालणार आहे.
व्यासपीठावर डाएट चे प्राचार्य डॉ.राजेंद्र भोई,अधिव्याख्याता प्रा.तुकाराम कुंभार,scerte च्या समता विभागाच्या एनजीओ प्रतिनिधी सोनल शिंदे,डॉ.योगेश सुरवसे,सुभाष बुवा,अधिव्याख्याता सोलापूर डाएट,तज्ञ मार्गदर्शक संजय जगताप, गजानन देशमुख, सुनील भांग्रे, अनिल नवले, ज्ञानदेव कुरंदळे, मधुकर माने उपस्थित होते.
डॉ.भोई म्हणाले,शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांमध्ये त्यांची कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव जागृती व्हावी. शाळाशाळांच्या विकास प्रक्रियेमध्ये पालकांचा, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांचा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यंत्रणेचा सहभाग वाढावा या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समित्या सक्षम होणे अत्यन्त महत्वाचे आहे. इथून पुढच्या ग्लोबल शिक्षण प्रणालीमध्ये ‘व्यवस्थापन’ची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा यामध्ये मुलांचे शिकणे अधिक प्रभावी व गतिमान होण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीला कायदेशीर अधिकार प्रदान केले आहेत.या अधिकारांच्या जाणीव जागृतीबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांमध्ये त्यांच्या कर्तव्याची जाण व्हावी आणि गावोगावच्या शाळा समृद्ध व्हाव्यात, यासाठी शाळा व्यवस्थापन समिती महत्त्वाच्या आहेत. निपुण भारत कार्यक्रमांतर्गत गावोगावच्या शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती जितकी सक्षम आणि सक्रिय होईल त्या त्या गावात शाळांचे रूपडे पालटेल असे मत प्राचार्य भोई यांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकात बोलताना डाएट कोल्हापूर चे अधिव्याख्याता वर्गसमन्वयक प्रा. तुकाराम कुंभार म्हणाले,
लोकसहभाग, ग्रामप्रशासन,समाज यांच्या सहकार्यांमधून शाळा कात टाकतील, यासाठी व्यवस्थापन समितीचे कार्य आणि योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना त्यांच्या हक्क- अधिकाराची जाणीव होण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणातून प्रशिक्षणार्थ्यांनी घेतलेल्या ज्ञानाचा प्रसार राज्यभर करावा.
किल्ले पन्हाळगडाच्या नगरपरिषदेच्या सभागृहात तीन
दिवस प्रशिक्षण चालणार आहे.यावेळी तज्ञ मार्गदर्शक संजय जगताप,गजानन देशमुख यांनी “शाळा सर्वांची जबाबदारी प्रत्येकाची” या कार्यशाळेची रूपरेषा विशद केली.
प्रशिक्षणास रेणुका जाधव,डॉ. सुरेश माने,प्राची पाटील, राजेंद्र पाटील, सर्जेराव सुतार, किशोरी चौगुले, प्रदीप पवार, शिवलिंग गुमे,अनिल थोरबोले, अमित चाकोते,ज्योती अवघडे,अमोल स्वामी,आबासाहेब जाधव,श्रीकांत कुंभार, मुकेश क्षीरसागर यासह राज्याच्या ३६ जिल्ह्यातून १५० च्या प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. तीन दिवस या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती फाळके,स्वागत प्रा.तुकाराम कुंभार तर आभार सुभाष बुवा यांनी मानले.
(चौकट)
कोल्हापूर चे नियोजन’लय भारी’
राज्यभरातील तब्बल १६० प्रशिक्षणार्थ्यांचे निवासी प्रशिक्षण पन्हाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात शाळा व्यवस्थापन समितीच्या हक्क- अधिकार- कर्तव्याचा जागर होणार आहे.
गतवर्षीच्या नेटक्या नियोजनामुळे सलग दुसऱ्यांदा कोल्हापूर डाएटला हे प्रशिक्षण संयोजन करण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल राज्यभरातून उपस्थित राहिलेल्या सर्वच प्रशिक्षणार्थ्यांनी प्राचार्य भोई,वर्ग समनव्ययक प्रा.तुकाराम कुंभार व सर्व संयोजन समितीचे टाळ्याच्या गजरात कौतुक केले.
(फोटो ओळी-शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन करताना डाएट कोल्हापूर चे प्राचार्य डॉ.राजेंद्र भोई,अधिव्याख्याता प्रा.तुकाराम कुंभार,scerte च्या समता विभागाच्या सोनल शिंदे,डॉ.योगेश सुरवसे,अधिव्याख्याता,
सुभाष बुवा तज्ञ मार्गदर्शक संजय जगताप, गजानन देशमुख, सुनील भांग्रे, अनिल नवले, ज्ञानदेव कुरंदळे, मधुकर माने आदी.)










