असर अहवालावरुन शिक्षक समिती प्रथमला धडा शिकवणार!
असर अहवालावरुन शिक्षक समिती प्रथमला धडा शिकवणार !
वकिलामार्फत संस्थेला नोटीस, कोर्टातही जाणार !!
कोल्हापूर/प्रतिनिधी
प्रथम शैक्षणिक प्रतिष्ठानतर्फे सरकारी शाळेतील शैक्षणिक स्थितीसंबंधी जाहीर केलेला ‘असर’अहवाल हा पूर्णत: एकांगी आहे. खोटा सर्व्हेक्षण व खोटा अहवाल तयार करुन सरकारी शाळांची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे असा थेट हल्लाबोल प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूर शाखेने केला आहे. ‘असर’अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ‘प्रथम’ने तीस दिवसाच्या आत कोल्हापूर जिल्ह्यात सर्व्हेक्षण केलेल्या तीस गावामधील सर्व शाळांमध्ये अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी, प्रसारमाध्यमाचे प्रतिनिधी असा संयुक्त सर्व्हे करावा आणि वस्तुस्थिती मांडावी अन्यथा संस्थेच्या विरोधात कोर्टात जाऊ असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर दिला आहे. वकिलामार्फत प्रथम संस्थेला कारवाई का करू नये यासंबंधी कायदेशीर नोटीस लागू केल्याचेही तौंदकर यांनी सांगितले.
विभागीय अध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर कमळकर यांच्या उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ‘प्रथम’संस्थेच्या ‘असर‘अहवालाची चिरफाड केली. ‘असर’चा अहवाल एकांगी, पूर्वग्रहदूषित व सरकारी शाळांची बदनामी करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग वाटतो. कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये शिक्षणक्षेत्रात तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये आघाडीवर असताना जिल्हयाची गुणवत्ता पहिल्या क्रमांकावरुन आठव्या क्रमांकावर घसरली असे ’असर’च्या अहवालात म्हणणे त्याचाच एक भाग आहे.’ असा आरोपही शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
‘राज्याच्या शिक्षणातील सरकारी शिखरसंस्था असलेल्या एससीईआरटीच्या माध्यमातून एसएलएएस ही अध्ययन संपादणूक चाचणी होते. ही चाचणी औपचारिक वातावरणात आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या पर्यवेक्षणामध्ये होते. शिवाय यासाठी निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुरेशा प्रमाणात असते. यामध्ये प्राथमिक शिक्षणाचे चित्र समाधानकारक दिसत असताना आणि विद्यार्थ्यांची संपादणूक क्षमता अपेक्षित असताना ‘असर’चा अहवाल मात्र नेमके उलटे चित्र दर्शविते. प्रथमचा अहवाल फक्त आकवडेवारी जाहीर करतो. मात्र त्यासाठी निवडलेली गावे, विद्यार्थ्यांची माहिती जाहीर करत नाही. शिवाय हा सर्व्हे करणाऱ्या सर्व्हेक्षकांचे शिक्षण किती होते ? तसेच ते शिक्षणशास्त्र अथवा शिक्षण प्रक्रियेशी संबंधित होते का ? याची माहिती देत नाही. ’याकडेही शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. शिवाय असर अहवालवरुन खुले आव्हान देणारा कोल्हापूर जिल्हा हा पहिला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी असर अहवाल हा एकांगी पद्धतीने तयार केल्याचे वस्तुनिष्ठपणे समोर आणले.
पत्रकार परिषदेला गणपती मांडवकर, सुनील कुंभार, सचिन कोल्हापुरे, हरिदास वर्णे, विनायक मगदूम, संतोष पाटील, संजय जितकर, संजय कडगाव, चंद्रकांत पाटील, संगिता अस्वले आदी उपस्थित होते.
सरकारी शाळांना बदनाम करण्याचे कारस्थान
————————————-
कोल्हापूर जिल्हा हा शिष्यवृत्ती मध्ये गेली ३५ वर्षे अव्वल क्रमांकावर आहे.,राज्यात या जिल्ह्याच्या गुणवत्तेचा नावलौकिक आहे.गतवर्षी २०२४ च्या शिष्यवृत्ती निकालामध्ये ३६% विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये कोल्हापूरचे होते. एन. एम.एम एस ला अनेक विद्यार्थी कोल्हापूरचे महाराष्ट्रामध्ये जास्त संख्येने येतात. प्रत्येक तालुक्यामध्ये करवीर टॅलेंट भुदरगड टॅलेंट सारख्या परीक्षा होऊन शिक्षक अधिक समयदान देऊन मुलं घडवताना दिसत आहेत असे अत्यंत चांगले शिक्षणाचे चित्र कोल्हापुरात असताना. प्रथम नावाच्या संस्थेने आपला असर अहवाल कोल्हापूरचा जाहीर केला यामध्ये पन्नास टक्के मुलांना गुणाकार येत नाही ५५% मुलांना भागाकार येत नाही तर तिसरी ते पाचवीच्या मुलांना दुसरीचे पुस्तक ४०% मुलांना वाचता येत नाही असे गंभीर आरोप केलेले आहेत. सदरचे आरोप हे आम्हाला अजिबात मान्य नाहीत. सदर संस्थेने आमचे अधिकारी पत्रकार बंधू त्यांची जी काय सर्वेक्षण करणारे टीम आहे यांच्यासोबत कोल्हापूर मधील शाळां चे पुन्हा सर्वेक्षण करावं आणि जे काय चित्र समोर येईल ते सादर करावे. आम्हाला बदनाम करण्याचं कटकारस्थान आम्ही कधी खपवून घेणार नाही.
— प्रमोद तौंदकर
जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती










