लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाज पटलावर झळकली पाहिजेत- पालकमंत्री प्रकाश आबिटकर
लोकांसाठी झटणारी समाजरत्ने समाज पटलावर झळकली पाहिजेत- पालकमंत्री प्रकाश आबिटकर
स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते कै. का. मा. आगवणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त समाजासाठी राबणाऱ्या व्यक्ती-संस्थाचा कृतज्ञता सत्कार
कोल्हापूर/मारुती फाळके
‘समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक का. मा. आगवणे यांनी आयुष्यभर सेवाभाव व समर्पितवृत्तीने कार्य केले. विविध क्षेत्रात काम करताना आपल्या कार्यकर्तत्वातून समाजासमोर खूप मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा वारसा जपताना समाजासाठी झटणारी रत्ने घडविणे आणि त्यांना पाठबळ देणे हेच खरे कार्य ठरेल. आणि ते कार्य सामाजिक स्वास्थासाठी उपयुक्त ठरेल. राजकारण्यांच्यापेक्षा, लोकांसाठी झटणारी सामाजिक रत्ने समाजासमोर झळकली पाहिजेत. ’ असे परखड मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते कै. का. मा. आगवणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते, विविध क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सत्कार करण्यात आला. रोख २५ हजार रुपये, मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे सत्काराचे स्वरुप आहे. यामध्ये जीवनमुक्ती सेवा संस्था (अशोक रोकडे), कलासाधना (विजय टिपुगडे), आमचा गाव आमचा विकास (प्रभाकर पाटील), वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था (युवराज कदम), अग्रणी पाणी फाऊंडेशन (शिवदास भोसले) यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येडगे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पालकमंत्री आबिटकर यांनी भाषणात आगवणे कुटुंबींयातर्फे आयोजित कार्यक्रम व कार्याचा मुक्तकंठाने प्रशंसा केली. मंत्री आबिटकर यांनी ‘का.मा. आगवणे यांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा आगवणे कुटुंबीय तितक्याच ताकतीने पुढे चालवित आहेत. मोठी माणसंही मोठी असतात. तो वारसा जपताना त्यांची पुढची पिढीही सर्वार्थाने काम करत मोठी ठरते हे आगवणे कुटुंबांतील सदस्यांनी कृतीतून दाखवून दिले.’ असे गौरवोद्गगार काढले.
ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांनी भाषणात कै. का. मा. आगवणे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. संपूर्ण आयुष्य समाजासाठी समर्पित केलेले व्यक्तिमत्व म्हणजे का. मा. आगवणे होय. त्यांच्या कुटुंबांनी तोच वारसा पुढे चालविला आहे.’असे चौसाळकर यांनी नमूद केले. जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, ‘एका जीवनात का. मा. आगवणे यांनी वेगवेगळया भूमिका जबाबदारीने पार पडल्या. समर्पित वृत्ती, कर्तबगारी, सामाजिक बांधिलकी या साऱ्यांचा मिलाफ त्यांच्या ठायी होता. त्यांच्या कार्यकर्तृत्वातून समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.’
प्रारंभी कै. का. मा. आगवणे यांच्यावर आधारित जीवनपट दाखविण्यात आला. याप्रसंगी ‘आठवणीचे तरंग’या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. कार्यक्रमात अशोक रोकडे, युवराज कदम यांनी मनोगत व्यक्त केले. माजी उपजिल्हाधिकारी विवेक आगवणे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. सुनिता आगवणे-वेताळ यांनी आभार मानले.
फोटो ओळी–
(स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते कै. का. मा. आगवणे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात समाजासाठी राबणाऱ्या विविध व्यक्ती-संस्थाचा सत्कार करताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, सोबत सत्कारमूर्ती जीवनमुक्ती सेवा संस्था (अशोक रोकडे), कलासाधना (विजय टिपुगडे), आमचा गाव आमचा विकास (प्रभाकर पाटील), वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था (युवराज कदम), अग्रणी पाणी फाऊंडेशन (शिवदास भोसले) आदी.)










